Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडच्या वीज समस्यांवर महावितरणची सकारात्मक पावले; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

 

मनमाड | प्रतिनिधी
मनमाड शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तक्रार निवारणातील अडचणी आणि वाढत्या नागरिकांच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे समोर आले आहे. आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांच्या नेतृत्वात २५ जून २०२६ रोजी महावितरण अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर महावितरणने विविध मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचे अधिकृत लेखी उत्तराद्वारे स्पष्ट केले आहे.

दि. १३ जुलै २०२६ रोजी कार्यकारी अभियंता, महावितरण ग्रामीण विभाग, मनमाड यांनी दिलेल्या उत्तरानुसार मनमाड शहरासाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद मिळावा यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवर उपलब्ध राहण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
शहरातील मुख्य बाजारपेठ, दवाखाने आणि शैक्षणिक संस्थांना अधिक दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी ११ केव्ही कॅम्प फिडरवरील भार ११ केव्ही पाकीजा फिडरवर स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

स्मार्ट मीटर संदर्भातही महावितरणने महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. घरगुती ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची कोणतीही सक्ती करण्यात येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, स्मार्ट मीटरच्या वीजबिलांबाबतच्या तक्रारी २४ तासांच्या आत निकाली काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मनमाड शहरातील वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून १३२ केव्ही मनमाड सबस्टेशन अंतर्गत नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्राला मंजुरी मिळाली आहे. आवश्यक जागेचे हस्तांतरण पूर्ण झाल्याने या प्रकल्पाचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

हुडको फिडरवरील वीजपुरवठा बाधित होणार नसल्याची ग्वाहीही महावितरणने दिली आहे. वाघदर्डी गावठाणचा भार त्या फिडरवर टाकण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, बुरकूलवाडी सबस्टेशन ते वाघदर्डी फिडर दरम्यान ललवाणी लॉन्स परिसरात आयसोलेटर बसविण्याचे काम १८ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
याशिवाय नांदगाव रोड, चांदवड रोड आणि लासलगाव रोड परिसरासाठी नवीन ३३ केव्ही लिंक लाईनचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, भविष्यात या भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.


याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे म्हणाले, "मनमाडकरांच्या वीज समस्यांवर आम्ही सातत्याने आवाज उठवला. त्याची गंभीर दखल घेत महावितरणने विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, केवळ आश्वासने नव्हे तर त्यांची वेळेत अंमलबजावणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा मिळेपर्यंत शिवसेनेचा पाठपुरावा कायम राहील."
महावितरणच्या या सकारात्मक निर्णयांमुळे मनमाड शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वीज समस्यांवर दिलासा मिळण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या