Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सणासुदीच्या दिवसातही मनमाड हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर अंधार; स्ट्रीट लाईट चालू करण्यास प्रशासन नेमके कोणाची वाट पाहत आहे?

 

मनमाड शहरातील पाकीजा कॉर्नर, बसस्थानकासमोरील महामार्गावरील स्ट्रीट लाईट पुन्हा एकदा बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सणासुदीचे दिवस सुरू असताना या प्रमुख मार्गावर अंधाराचे साम्राज्य असणे ही केवळ गैरसोय नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे.

वर्षाचे ३६५ दिवसापैकी सणासुदीचे दोन-तीन दिवस तरी शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था सुरळीत ठेवणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी असतांना देखील जबाबदारी पार पाडली जाते का?


नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या, विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रे निवेदने दिली, प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आवर्जून आणून दिली; तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च! मग प्रश्न असा निर्माण होतो की, तक्रारी आणि पत्रव्यवहार फक्त कागदावरच ठेवण्यासाठी आहेत का?

 असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे 
पाकीजा कॉर्नर आणि बसस्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्ग हा शहरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. रात्रीच्या वेळी येथे अंधार राहिल्यास पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? हा देखील गंभीर प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे 
प्रशासनाने ‘अपघाताची वाट’ पाहू नये!

स्ट्रीट लाईट दुरुस्त करणे ही काही महिन्यांची किंवा वर्षभराची प्रक्रिया नाही. बिघाड झाला तर तातडीने दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. मात्र वारंवार दिवे बंद पडत असतील, तर त्यामागील मूळ कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
सणासुदीच्या काळात शहर प्रकाशाने उजळले पाहिजे; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अंधारात बुडालेले दिसता कामा नये.

नगरपरिषद प्रशासनाने आता केवळ आश्वासन न देता पाकीजा कॉर्नर ते बसस्थानकासमोरील महामार्गावरील बंद स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करावेत, तसेच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील स्ट्रीट लाईटची विशेष तपासणी मोहीम राबवावी.
कारण नागरिकांना अंधार नको, सुरक्षित आणि प्रकाशमान मनमाड हवे आहे!

प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली नाही, तर नागरिकांचा संताप आणखी तीव्र होणे स्वाभाविक आहे. आता तरी मनमाड नगरपरिषद प्रशासनाने खडबडून जागे व्हावे आणि ‘स्ट्रीट लाईट बंद’ या कायमच्या समस्येला कायमचा पूर्णविराम द्यावा!
 अशी रास्त मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या