Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडकरांनो पाण्याचा अपव्यय टाळा! नळांना तोट्या न लावल्यास ५०० रुपयांचा दंड; नळजोडणी खंडित करण्याचा नगरपरिषदेचा इशारा


मनमाड | दि. १७ जून २०२६
मनमाड शहरावर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले असून, उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मनमाड नगरपरिषदेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात वाढलेल्या तापमानामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले असून, तलाव व धरणांमधील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मनमाड शहराला मागील अनेक वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या नगरपरिषदेकडून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून, भविष्यात पाणी वितरणाच्या वेळेत कपात करण्याची शक्यता असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पाणीपुरवठ्यावेळी अनेक भागांमध्ये नागरिकांच्या नळांना तोट्या नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे नगरपरिषदेच्या निदर्शनास आले आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी वाया जाणे ही गंभीर बाब असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

नगरपरिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या घरांमधील नळांना तोट्या बसविलेल्या नाहीत त्यांनी पुढील पाणी वितरणापूर्वी तातडीने तोट्या बसवून घ्याव्यात. अन्यथा पाणी वाया घालविणाऱ्या नागरिकांवर प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच दंड न भरल्यास संबंधितांची नळजोडणी तात्काळ खंडित करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मुख्याधिकारी शेषराव चौधरी आणि नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी मनमाडकरांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

"पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा — आजची बचत उद्याची गरज पूर्ण करेल!"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या