मनमाड | दि. ३ फेब्रुवारी २०२६
मनमाड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज नगराध्यक्ष दालनात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला माननीय नगराध्यक्ष.योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य अधिकारी. शेषराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत सध्या मनमाड शहरात आठवड्यातून सोमवार व गुरुवार या दोन दिवस होत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून जुने पाणी फेकून दिले जात असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर व नाल्यांमध्ये पाणी वाहताना दिसत असल्याने नगराध्यक्षांनी नागरिकांना आवाहन केले की, पाणी आल्यावर जुने पाणी न फेकता ते वापरण्यासाठी साठवून ठेवावे.

तसेच प्रत्येक नागरिकांनी आपल्या नळाला तोटी (नळाचा झडप) बसवणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना याबाबत कडक अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील अनेक भागांतून पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित करण्याची मागणी येत असल्याने, नगराध्यक्षांनी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत पाणीपुरवठा सुरू ठेवून प्रत्येक भागासाठी वेळ निश्चित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित विभागाने आपापल्या भागातील व्हॉट्सॲप ग्रुपवर आधीच सूचना देऊन नागरिकांना वेळ कळवावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

पाणीपुरवठा सुरळीत, नियमित व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी सर्व स्तरांवर दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, शक्य तेथे तांत्रिक सुधारणा करण्याचेही निर्देश देण्यात आले.

यावेळी नगरसेवक. मुस्ताक कुरेशी यांनीही उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीस पाणीपुरवठा विभागप्रमुख श्री. किरण आहेर, मुक्तार शेख, भारत वाघ, जॉनी जॉर्ज यांच्यासह सर्व वॉटरमन व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष. योगेश पाटील यांनी शेवटी नागरिकांना विनम्र आवाहन केले की, “पाणी ही मौल्यवान संपत्ती आहे. प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळून जबाबदारीने वापर करावा.”