Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नांदगाव तालुक्यातील जत्रांमध्ये व्यापाऱ्यांची पोलिसांकडे धाव; तृतीयपंथीयांकडून जबरदस्तीच्या वसुलीचा आरोप

 

नांदगाव तालुक्यातील जत्रांमध्ये व्यापाऱ्यांची पोलिसांकडे धाव; तृतीयपंथीयांकडून जबरदस्तीच्या वसुलीचा आरोप

मनमाड | १३ फेब्रुवारी २०२६
नांदगाव तालुक्यात सुरू असलेल्या विविध जत्रा–उत्सवांमध्ये व्यापाऱ्यांना तृतीयपंथीयांकडून त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप करत व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार पोलिस निरीक्षक तसेच मनमाड पोलीस ठाण्यात सादर करण्यात आली असून संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांच्या निवेदनानुसार, जत्रा परिसरात १० ते १५ जणांच्या गटाने दुकानांवर येऊन ५० ते १०० रुपयांची जबरदस्तीने मागणी केली जाते. पैसे देण्यास नकार दिल्यास अश्लील शिवीगाळ, दमदाटी, मारहाण तसेच दुकानातील वस्तू उचलून नेण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खेळणी, कपडे, कटलरी आदी वस्तूंची विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना या प्रकारामुळे आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जत्रांमध्ये महिला भाविक आणि महिला दुकानदारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असते. अशा वेळी गैरवर्तनाच्या घटना घडल्याने वातावरण असुरक्षित बनत असल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वारंवार होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

तालुक्यात यात्रांचा हंगाम सुरू असून आगामी जत्रांमध्येही अशाच प्रकारांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनी जत्रा परिसरात बंदोबस्त वाढवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या तक्रारीची प्रत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांना देण्यात आली. मनमाड येथील जनसंपर्क कार्यालयात शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे व जिल्हा उपप्रमुख सुनिल हांडगे यांनी निवेदन स्वीकारले.

तक्रार करणाऱ्यांमध्ये संदीप सोचे, एजाज देशमुख,किरण हजारे, तनवीर शेख, नोसिदा शेख, मंगेश हजारे यांसह सुमारे ५० ते ६० व्यापाऱ्यांचा समावेश आहे. तसेच प्रत माहितीसाठी नागापुरचे सरपंच व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन चौकशी सुरू केल्याची माहिती समोर येत असून जत्रांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या