Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

दिंडोरी लोकसभेचे खासदार बेपत्ता? शोधून देणाऱ्यास रिपाइंकडून बक्षीस!


 दिंडोरी लोकसभेचे खासदार बेपत्ता? शोधून देणाऱ्यास रिपाइंकडून बक्षीस!

मनमाड-गोदावरी एक्सप्रेस, अजंता एक्सप्रेससह मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवरून रिपाइंचा आक्रमक पवित्रा

मनमाड : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने खासदार भास्कर भगरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मतदारसंघातील नागरिकांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना त्यांचा प्रभावीपणे पाठपुरावा होत नसल्याचा आरोप करत, “खासदार महोदय बेपत्ता आहेत; त्यांना शोधून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल,” असा उपरोधिक इशारा रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापारी वर्गाशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप मार्गी लागलेले नाहीत. रस्ते, आरोग्य, शिक्षण, वाहतूक तसेच रेल्वे सुविधांशी संबंधित प्रश्नांवर तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे रिपाइंचे म्हणणे आहे.
मनमाड-गोदावरी एक्सप्रेसचा प्रश्न ऐरणीवर
मनमाड परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या मनमाड-गोदावरी एक्सप्रेसच्या प्रश्नावर ठोस पाठपुरावा करण्याची मागणी रिपाइंकडून करण्यात आली आहे. मनमाडहून गोदावरी एक्सप्रेस सुरू व्हावी, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

अजंता एक्सप्रेस भुसावळला हलविण्याला विरोध
दरम्यान, मनमाडहून सुटणारी अजंता एक्सप्रेस भुसावळ येथून सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा रिपाइंकडून करण्यात आला आहे. हा निर्णय मनमाडकर प्रवाशांसाठी अन्यायकारक ठरेल, असा आरोप करत अजंता एक्सप्रेसची सेवा मनमाडहूनच कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

मनमाडचे रेल्वेच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेता, येथील रेल्वेसेवा कमी करण्याऐवजी वाढविणे आवश्यक आहे. यापूर्वीही मनमाडहून सुरू असलेल्या काही रेल्वेसेवा इतर स्थानकांकडे वळविण्यात आल्याचा दावा रिपाइंकडून करण्यात आला. त्यामुळे आता तरी मनमाडकरांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.

“प्रश्न मांडण्यासाठी खासदारांना शोधावे लागतेय!”
मतदारसंघातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न लोकसभेत आणि संबंधित मंत्रालयांकडे मांडणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. मात्र, अनेक प्रश्न प्रलंबित असताना खासदारांची अपेक्षित उपस्थिती व पाठपुरावा दिसत नसल्याचा आरोप रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

“प्रश्न मांडण्यासाठी खासदार महोदयांनाच शोधावे लागत असेल तर नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची?” असा सवाल उपस्थित करत, खासदारांना शोधून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्याचे आवाहन रिपाइंकडून करण्यात आले आहे.
आंदोलनाचा इशारा

मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा तातडीने आढावा घेऊन मनमाड-गोदावरी एक्सप्रेस, अजंता एक्सप्रेस, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी रिपाइंकडून करण्यात आली आहे.
घोषणांपेक्षा प्रत्यक्ष विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक महत्त्वाची आहे. संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या भूमिकेला रिपाइंचे जिल्हा व शहर पदाधिकारी, नेते तसेच कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या