Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न; इंडियन हायस्कूलच्या विद्यार्थी-पालक-शिक्षकांना सुहास कांदे यांच्याकडून मोठा दिलासा

 

मनमाड : मनमाड नगर परिषदेच्या थेट लोकनियुक्त नगराध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) चे योगेश पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. आमदार सुहास कांदे, अंजुमताई कांदे, फरहानदादा खान आणि मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
व्यासपीठावर मुख्याधिकारी शेषराव चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे, योगेश पाटील दांपत्य, सुहास कांदे, अंजुमताई कांदे, फरहानदादा खान, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, मयूर बोरसे, अल्ताफ खान, उमाकांत राय आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी मयूर बोरसे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील व सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे यांनी सुहास कांदे यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास टाकल्याचे नमूद केले. राजेंद्र पगारे यांनी २०१९ पासून सुहास कांदे यांच्या विकासाच्या झंझावाताचा अनुभव घेतल्याचे सांगितले. राजेंद्र भाबड यांनी मनमाडच्या जनतेसाठी तुळजाभवानीच्या आशीर्वादाची प्रार्थना केली.
माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी सुहास कांदे यांना 'विकास पुरुष' संबोधित करत त्यांना किमान २५ वर्षे आमदार राहण्याचा आशीर्वाद दिला. अंजुमताई कांदे यांनी जनतेच्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या योगदानाची ग्वाही दिली.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी पदाची शपथ घेऊन निष्ठेने विकासकामे करण्याचे वचन दिले.
आमदार सुहास कांदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जनतेच्या आशीर्वादाने योगेश पाटील नगराध्यक्ष तर बहुसंख्य नगरसेवक निवडून आले. बब्बू कुरेशी यांनी शिवसेनेत प्रवेश करून विश्वास दाखवला, त्यांचे स्वागत आहे. अपयशी उमेदवारांना एक दिवस नगरसेवक बनवण्याचे वचन देतो. विरोधकांनी मोठी ताकद लावली तरी जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या विकासकामांवर मत मागितली आणि जनतेच्या विश्वासाने ते साध्य झाले. हा विकास मनमाडच्या जनतेच्या चरणी अर्पण करतो. शरीरातील शेवटचा रक्तथेंबा असेपर्यंत मनमाडच्या जनतेची सेवा करेन.

नगरसेवकांना प्रेमाने वागण्याचा व जनतेच्या समस्या सोडवण्याचा सल्ला देताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, उद्धट वर्तन किंवा कामे न करणाऱ्या नगरसेवकांचा राजीनामा घेण्यात मागेपुढे पाहणार नाही. निवडून आल्यानंतर पक्षाचे नव्हे, तर जनतेचे प्रतिनिधी असावे, हे लक्षात ठेवा.

विशेष म्हणजे, शहरातील जुन्या नावाजलेल्या इंडियन हायस्कूलचा रेल्वे विरोधातील हायकोर्टात पराभव झाल्यानंतर विद्यार्थी, पालक व शिक्षकांना दिलासा देणारी घोषणा सुहास कांदे यांनी केली. ते म्हणाले, "मी स्वखर्चाने सुप्रीम कोर्टात गेलो आहे. न्याय मिळाला नाही तरी नगर परिषदेच्या शाळांच्या खोल्या उपलब्ध करू, मोठा भूखंड मिळवून देऊ आणि बांधकामासाठी भरघोस निधी देऊ. घाबरू नका, सुहास कांदे व शिवसेना नेहमी तुमच्या पाठीशी आहे."

सूत्रसंचालन किरण आहेर यांनी केले. सोहळ्याला नागरिकांची मोठी उपस्थिती होती. हा सोहळा मनमाडच्या विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या