Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मालेगाव : गिरणा पुलाजवळ केटीवेअर बंधाऱ्यावर तोल जाऊन तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू


मालेगाव प्रतिनिधी दिनांक : २५ नोव्हेंबर २०२५मालेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळील गिरणा नदीवरील केटीवेअर बंधाऱ्याजवळ सोमवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. बंधाऱ्यावरून चालताना एका २४-२५ वर्षीय तरुणाला अचानक चक्कर आल्याने तोल जाऊन तो थेट खोल पाण्यात कोसळला. पाण्याची खोली प्रचंड असल्याने आसपास असलेल्या नागरिकांना मदत करता आली नाही. अखेर तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

घटनेची माहिती मिळताच मालेगाव महानगरपालिकेचे प्रसिद्ध जलतरणपटू आणि बचावकार शकील तैराक यांच्या टीमने त्वरेने घटनास्थळी धाव घेतली. खोल पाण्यात आणि प्रतिकूल परिस्थितीतही शकील यांनी धैर्याने शोधमोहीम राबवली आणि सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह तात्काळ मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला; मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले.

मृत तरुणाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
हे ठिकाण यापूर्वीही अनेक जीव घेणारे ठरले आहे. गेल्या काही वर्षांत याच केटीवेअर बंधाऱ्यावर आणि परिसरात १५ पेक्षा जास्त जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही हौसेने, फोटो काढण्यासाठी किंवा फिरायला येऊन अनेकजण बंधाऱ्यावर चालतात, सेल्फी घेतात. प्रशासनाने वारंवार सूचना, फलक आणि आवाहन करूनही नागरिकांची बेफिकिरी कमी होताना दिसत नाही.

या घटनेनंतर मालेगावचे पोलीस उपअधीक्षक आणि महापालिका आयुक्तांनी पुन्हा एकदा नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे की,  
“केटीवेअर बंधारा आणि गिरणा नदीचा हा परिसर अत्यंत धोकादायक आहे. पाण्याची खोली आणि वेग येथे जीवघेणा आहे. कृपया अनावश्यक वावर, सेल्फी, फिरणे पूर्णपणे टाळा. आपला आणि कुटुंबियांचा जीव धोक्यात घालू नका."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या