Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नाशिक ग्रामीण पोलिसांची दमदार कारवाई: येवला लुटमार प्रकरणातील सराईत गुन्हेगार अटकेत, अभोण्यात पिस्टल-काडतुसे जप्त

 


नाशिक, दि. १३ जून २०२५: नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केलेल्या प्रभावी कारवाईत येवला शहरातील जबरी लुटमार प्रकरणातील आंतरजिल्हा सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. तसेच, कळवण तालुक्यातील अभोणा शिवारात देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि चोरीच्या चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा धाक कायम राहण्यास मदत झाली आहे.

येवला लुटमार प्रकरणात सराईत गुन्हेगार जेरबंद

येवला शहरातील साई पैठणी दुकानात १३ जानेवारी २०२५ रोजी अज्ञात आरोपींनी चाकू आणि तलवारीचा धाक दाखवून १९,००० रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. येवला शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सराईत गुन्हेगार फराज एजाज सैय्यद (वय २२) याला कोपरगाव नाका परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले दोन मोबाइल फोन (व्हिवो व्ही-२९ आणि रेडमी नोट-१०, किमती १३,००० रुपये) जप्त करण्यात आले.

फराजने चौकशीत आपले साथीदार आसिफ शेख आणि जैदखान अमजखान पठाण (दोघेही कोपरगाव येथील) यांच्यासह ही लूट केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, फराज हा शिर्डी पोलीस ठाण्यातील एका गंभीर गुन्ह्यात फरार होता. त्याला येवला पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांना या प्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.


अभोण्यात पिस्टल, काडतुसे आणि चोरीच्या मोटरसायकली जप्त

कळवण तालुक्यातील अभोणा शिवारातील पिंपळे खुर्द गावात चोरीच्या मोटरसायकलींची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पथकाने तात्काळ छापा टाकला असता, संशयित हिराचंद उर्फ महाराज शिवाजी बर्डे (रा. पिंपळे खुर्द) पळून गेला. मात्र, तपासणीत त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल,दोन जिवंत काडतुसे,एक एअरगन आणि चार चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. या मोटरसायकली कळवण, अभोणा आणि वणी परिसरातून चोरीच्या असल्याचे तपासात उघड झाले. हिराचंदविरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचे कौतुक, गुन्हेगारांवर वचक

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक,बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक,आदित्य मिरखेलकर आणि ,तेगबीर सिंह संधू,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक,रविंद्र मगर,यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई यशस्वी केली. पथकात,हर्षल भोळे,शिवाजी ठोंबरे, पोलीस अंमलदार ,प्रविण काकड,रावसाहेब कांबळे ,योगिता काकड,किशोर खराटे,प्रशांत पाटील,सुधाकर बागुल,विशाल आव्हाड,केतन कापसे,हेमंत गिलबिले,प्रदिप वाचंद,छाया गायकवाड,अस्मिता मढवई यांचा समावेश होता.

प्रशासनाचा गुन्हेगारांना इशारा

या कारवाईमुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, "जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क आहे. सराईत गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही." ही कारवाई गुन्हेगारांसाठी धडकी भरवणारी असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या