Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

भाजपाचा 45 वा स्थापना दिन: भारतीय जनसंघ ते विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्षाचा गौरवशाली प्रवास

 

भाजपाचा 45 वा स्थापना दिन: भारतीय जनसंघ ते विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्षाचा गौरवशाली प्रवास.

नितीन पांडे, भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष  

नाशिक, 06 एप्रिल 2025: आज रविवार, दिनांक 06 एप्रिल 2025 रोजी भारतीय जनता पार्टी (भाजपा) आपला 45 वा स्थापना दिन (वर्धापन दिन) साजरा करत आहे. भारतीय जनसंघापासून सुरू झालेला हा ऐतिहासिक प्रवास आज संपूर्ण विश्वातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या रूपात उभा आहे. या प्रवासात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या समर्पणाने आणि देशभक्तीच्या प्रेरणेने भाजपाने अनेक संकटांवर मात करत देशाच्या राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

भारतीय जनसंघाची स्थापना आणि सुरुवातीचा काळ

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर आधारित देशातील पहिला विरोधी पक्ष म्हणून 21 ऑक्टोबर 1951 रोजी स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. एकात्म मानवतावाद, राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, आर्थिक समता, सामाजिक न्याय आणि सर्वपंथ समभाव या मूलतत्त्वांवर आधारित हा पक्ष उभा राहिला. डॉ. मुखर्जी यांच्या अकाली निधनानंतर स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी पक्षाची धुरा सांभाळली. परंतु त्यांचेही आकस्मिक निधन झाले. या दोन्ही नेत्यांच्या मृत्यूचे गूढ आजही कायम आहे. तरीही स्व. नानाजी देशमुख, स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी प्रतिकूल परिस्थितीत पक्षाला मजबूत केले.

आणीबाणी आणि पहिला टर्निंग पॉईंट

1975 च्या आणीबाणीविरोधी आंदोलनात भारतीय जनसंघाने जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय सहभाग घेतला. या आंदोलनाचे संचालन स्व. नानाजी देशमुख, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांनी केले. 1977 मध्ये प्रथमच जनसंघाने सत्तेत सहभाग घेतला. परंतु मूल्यांशी तडजोड न करता पक्षाने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि 06 एप्रिल 1980 रोजी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंग यांच्यासह अनेक दिग्गजांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली.

संघर्ष ते सत्तेची वाटचाल

1985 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला केवळ 2 जागा मिळाल्या आणि देशभरातून टीका झाली. परंतु अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, प्रमोद महाजन यांनी पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केली. 1989 च्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनात भाजपाने सक्रिय सहभाग घेतला आणि 89 जागा जिंकल्या. 1990 मध्ये लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली काढलेली ‘श्रीराम संघर्ष रथयात्रा’ हा दुसरा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर 1996 मध्ये 161, 1998 मध्ये 181 आणि 1999 मध्ये 182 जागा जिंकत भाजपाने अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन केली.नमो युग आणि अभूतपूर्व यश

2004 ते 2014 हा काळ भाजपासाठी संघर्षमय राहिला. अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवृत्ती घेतली, तर प्रमोद महाजन यांचे अकाली निधन झाले. परंतु 2013 मध्ये नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीचे नेतृत्व देण्यात आले आणि 2014 मध्ये भाजपाने स्वबळावर 282 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. हा तिसरा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर 2019 मध्ये 303 आणि 2024 मध्ये एनडीएच्या 293 जागांसह भाजपाने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली.

महाराष्ट्रातील योगदान

महाराष्ट्रात स्व. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाला मजबूत केले. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 123 जागा जिंकत सत्ता स्थापन केली. आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यरत आहे.

आजचा भाजपा

आज भाजपाकडे 20 कोटींहून अधिक सभासद आहेत, 29 राज्यांत सत्ता आहे आणि 404 खासदार, 1600 हून अधिक आमदारांसह असंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले, ज्यात 370 कलम रद्द, श्रीराम मंदिर बांधणी आणि तीन तलाक कायदा यांचा समावेश आहे.

कार्यकर्त्यांचे योगदान

भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी सांगितले, “भारतीय जनसंघ ते भाजपाच्या या गौरवशाली वाटचालीत असंख्य कार्यकर्त्यांनी आपले जीवन समर्पित केले. या 45 व्या स्थापना दिनी सर्व ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांना वंदन करतो.” त्यांनी पुढे म्हटले की, “आगामी निवडणुकांमध्ये ‘अब की बार सिर्फ भाजपा सरकार’ हा नारा प्रत्येक कार्यकर्त्याने साकार करावा.”

भविष्याचा संकल्प

हिंदुस्थानला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते कटिबद्ध आहेत. या स्थापना दिनानिमित्त पक्षाने ‘काँग्रेसमुक्त भारत’ आणि लोककल्याणकारी ध्येयासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. नितीन पांडे, भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या