कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे लोकनेते व्यंकटराव हिरे यांची जयंती साजरी.



मनमाड. गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दि. 24/04/2022 रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेचे आधारवड लोकनेते व्यंकटराव हिरे यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरुण पाटील यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे व लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रा एन. डी पगार होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून लोकनेत्यांचे कार्य विशद केले. मोसम खोरे व माळमाथ्याची जनता कै.व्यंकटराव हिरे यांचे ऋण कधीच विसरणार नाही.इतके भरीव कार्य त्यांनी कले आहे. राजकारण, शिक्षण व सहकार या तिन्ही क्षेत्रातील लोक नेत्यांची कामगिरी आपल्या व्याख्यानातून प्रा. पगार यांनी सांगितली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.पाटील यांनी लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला .राजकारण,शिक्षण व सहकार या तिन्ही क्षेत्रात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्याप्रमाणेच लोकनेत्यांनी या तिन्ही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली. शेतकरी, आदिवासी व दलित समाजावर लोकनेते व्यंकटराव हिरे यांचे अपार प्रेम होते. आणि त्यांनी ते कृतीतून सिद्ध केले. जिल्ह्यातील धरण, पाझर तलाव,व गाव तळी निर्माण करून कै.व्यंकटराव हिरे यांनी पाणीपुरवठा योजना राबवून पाणी समस्या कायमची सोडविली. धडाडी, संघटन कौशल्य व करारीपणा हे तिन्ही गुण त्यांच्यात होते. लोकनेत्यांना सत्तेचे केंद्रीकरण पसंत नव्हते. त्यांची लोकशाहीवर निष्ठा होती. लोकशाहीच्या मूल्यांसाठी लढणे हाच त्यांचा ध्यास होता.इत्यादी विचार त्यांनी मांडले.
सदर कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रमोद आंबेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री पी के बच्छाव, श्रीमती जे.आर. पालवे कुलसचिव समाधान केदारे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.